Weather Alert Today:हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, 28 जानेवारी रोजी रात्री राज्याच्या काही भागांत पावसाचे थेंब पडले असून, आता 28 आणि 31 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रात हवामान खराब राहण्याची शक्यता आहे.
हा पाऊस सर्वदूर नसला तरी काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. 31 जानेवारीपासून हवामान पुन्हा स्वच्छ होण्यास सुरुवात होईल.
आज आणि उद्या ‘या’ भागांत पावसाची शक्यता
आज मध्यरात्री (28 जानेवारी) आणि उद्या (31 जानेवारी) राज्याच्या विविध भागांत पावसाची शक्यता आहे:
दक्षिण महाराष्ट्र व कोकण: सांगली, सोलापूर, सातारा जिल्हा, जत, पंढरपूर आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी.
पश्चिम महाराष्ट्र: अहिल्यानगर (अहमदनगर), बारामती, श्रीगोंदा, कडा, आष्टी.
मराठवाडा: बीड, लातूर, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा.
उत्तर महाराष्ट्र: नाशिक, जळगाव, धुळे, मालेगाव आणि शिरूर पट्टा.
हा पाऊस पुढे सरकत उद्या बुलढाणा, मेहकर, लोणार, रिसोड, खामगाव, नांदुरा या भागांत आणि त्यानंतर विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर व भंडारा या पट्ट्यात पोहोचण्याची शक्यता आहे. हा पाऊस भाग बदलत पडणार असून तो सर्वत्र सारखा नसेल.
शेतकरी आणि व्यावसायिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
वातावरणातील या बदलामुळे पंजाब डक यांनी विविध क्षेत्रातील लोकांसाठी खालीलप्रमाणे खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:
विट उत्पादक: दुपारनंतर आपल्या कच्च्या विटा ताडपत्रीने झाकून घ्याव्यात, जेणेकरून रात्री होणाऱ्या पावसाने नुकसान होणार नाही.
द्राक्ष व डाळिंब बागायतदार: पावसामुळे वातावरणात धुईचे (धुके) प्रमाण वाढू शकते. त्यामुळे पाऊस येण्यापूर्वी बागेवर आवश्यक ती प्रतिबंधात्मक औषध फवारणी करून घ्यावी.
कांदा व तंबाखू उत्पादक: काढणी केलेला कांदा किंवा तंबाखू सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा. विशेषतः कर्नाटक सीमावर्ती भागातील (निपाणी, बेळगाव) शेतकऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी.
तूर उत्पादक: तूर किंवा इतर शेतीमाल उघड्यावर असेल तर तो तातडीने झाकून ठेवावा.
निसर्गाचे संकेत आणि अंदाज
आज बाहेर फिरताना पूर्वेकडून जोराचे वारे किंवा वावटूळ येताना दिसली, तर समजावे की पावसाचे वातावरण तयार होत आहे. 31 जानेवारीपासून वातावरण निवळण्यास सुरुवात होईल, तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या मालाची सुरक्षा करावी. हा पाऊस जरी खूप मोठा नसला तरी ढगाळ हवामान आणि पावसामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा हवामान अंदाज उपग्रह चित्रे आणि निसर्गातील बदलांच्या निरीक्षणावर आधारित आहे. स्थानिक पातळीवर हवामानात बदल होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा.